Sunday, January 30, 2022

'बाबागिरी' न करणारा, तरीही सगळ्यांचा 'बाबा'

 #अनिल_अवचट गेले त्याला आज चार दिवस होतील. ते गेले त्या दिवशीच लिहायचं होतं खरं तर, पण काही वैयक्तिक व्यवधानामुळे नाही जमलं. लिहिलं तर पाहिजेच पण I owe him a lot.

साधारण वीसेक वर्षांपूर्वीची सोशलमीडिया पूर्व काळातली गोष्ट. आईमुळे वाचनाची भयंकर आवड, अगदी पुडीला बांधून आलेला कागद, रोजचा पेपर, चित्रलेखा,गृहशोभिका, चांदोबा काही म्हणता काही सोडायचो नाहीत आम्ही! हे सगळं पुरेना तेंव्हा मग लायब्ररी लावली सोलापुरातली तशी छोटीशी- संतसेवा वाचनालय असं टिपिकल नाव असलेली. तिथं कादंबऱ्या, कथा, चरित्रे वगैरे वाचायला सुरुवात केली, काही काही आवडायच्या, काही नाही. आणि मग तेंव्हा तिथंच पहिली भेट झाली अनिल अवचटांशी. पहिलं पुस्तक नेमकं कोणतं वाचलं हे आता आठवत नाही, पण जेंव्हा त्यांचं वाचणं सुरू केलं तेंव्हा जाणवलं, हे काहीतरी जबरदस्त गुंतवून ठेवणारं आहे, हाडामासाच्या जिवंत माणसाच्या, त्यांच्या दुःख, कष्ट, वेदना, सुख, समाधानाच्या गोष्टी. 

त्यांचं स्वतःविषयी, माणसं, अंधेरनगरी निपाणी, धार्मिक, धागे उभे आडवे, प्रश्न आणि प्रश्न अशी कितीतरी पुस्तकं वाचली. पुण्याचा जुना बाजार, मिरचीची आणि तिखटाची पोती उचलणारे हमाल कामगार, त्यांची अवघड जागची दुखणी, निपाणीतल्या अगदी 80 वर्षांच्या आजीचे लैंगिक शोषण करणारा मालकाचा तरुण मुलगा, अन्यायकारक जात पंचायती, त्यात पणाला लागणारी लोकांची आयुष्य, गावाबाहेर टाकलेले पारधी, वैदू, भटक्या जमाती, सफाई कामगार, सांगलीतल्या हळदीच्या पेवामध्ये काम करणारे मजूर किती जण! आपल्यासारख्या पांढरपेशांसाठी केवढी वेगळी दुनिया, किती टोकाचा अन्याय आणि तीव्र दुःख. या सगळ्यातून विचार यायला लागला की आपण आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यात ज्याला दुःख आणि कष्ट म्हणून कुरवाळतो ते खरंच दुःख आणि कष्ट असतात का? 

'धार्मिक' हे पण अवचट यांचं फार महत्त्वाचं आणि माझ्यावर प्रभाव असलेले पुस्तक. त्यातली शेकडो स्त्रियांवर त्यांच्या राजीखुशीने, पूजेच्या नावाखाली लैंगिक संबंध ठेवायला लावणाऱ्या वाघमारे बुवाची गोष्ट, बायकांच्या दाबून असलेल्या, न भागलेल्या लैंगिक भुका, डोक्यात जटा झाल्याने देवाला वाहिलेल्या देवदासी , गाणगापूरला अंगात येऊन उड्या मारणारे मनोरुग्ण भक्त, गालात जिभेत सळ्या खुपसून घेणारा शेखसल्ल्याचा उरूस. ' धर्म म्हणजे अफूची गोळी' हे कॉलेज मध्ये समाजशास्त्रात शिकण्याच्या किती तरी आधी या पुस्तकाने समजावलं होतं. नास्तिकतेकडे विवेकवादाकडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सदस्य होण्याकडे वाटचाल होण्यासाठी सुद्धा हे पुस्तक मला उपयोगी पडलं. आमचं लग्न ठरण्याच्या आधी, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने रुढीप्रिय घरातून आलेल्या माझ्या नवऱ्याला Ankur Anant Sheludkar  ला 'This is how religion exploits' असं लिहून मी भेट दिलेलं हे पहिलं पुस्तक.  आधीचा आणि आताचा अंकुर यात बराच फरक पडलाय, त्याला काही अंशी हे पुस्तक कारणीभूत असावं.


मुळात अश्या सगळ्या गोष्टींवर लिहिता येतं, हे लिहिण्याचे विषय होऊ शकतात हे बाबांनी दाखवून दिलं. 'रिपोर्ताज' हा पत्रकारितेतला प्रकार आमच्या पिढीसाठी मराठीत रुजवला तो अनिल अवचटांनी. दुसरं अतिशय साध्या- सोप्या, आपण जणू गप्पाच मारतोय असं लिहिण्याच्या त्यांच्या शैलीचा सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव आहे. साधं सोपं, अनअलंकृत, कविता आणि शेरो शायरीने लदबडलेलं लिखाण / भाषण कधीच आवडलं नाही ते बाबांमुळेच.महाविद्यालयीन काळात सगळी भाषणं, निबंध आणि मग पत्रकारितेत आल्यावर लेखन ही जाणीवपूर्वक असंच ठेवण्यात बाबांचा आणि 'सकाळ' वृत्तपत्राच्या लेखनशैलीचा मोठा प्रभाव आहे. मुळात पत्रकारिता करावी, ही इच्छा मनात जगवण्यासाठी सुद्धा अनिल अवचट यांच्या लिखाणाचा, त्यांच्या विषयांचा मोठा वाटा आहे.

#नाही_रे' वर्गा विषयीचे लिखाण हा बाबांच्या लिखाणाचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असला तरी मला सर्वात जास्त त्यांची प्रतिमा आवडते ती 'फॅमिली मॅन' म्हणून. 'सुनंदाला काही झालं की मी अस्वस्थ होतो पण मुलींना काही झालं की मी कोलमडूनच जातो' म्हणणारा त्यांच्यातला 'बाप', बायकोच्या पाळीच्या काळात तिच्यासाठी घरात कोमट पाण्याची बादली नॅपकिन तयार ठेवणारा, तिच्या आवडत्या निशिगंधाच्या फुलांची सजावट करणारा नवरा, डॉ. सुनंदा आणि डॉ. अनिल अवचट यांचं अनोखं , प्रेमाने भरलेलं सहजीवन, शिक्षणाने डॉक्टर असूनही, लिखाणाचा, पत्रकारितेचा वसा स्वीकारणारे, फिल्डवर जाणारे अनिल अवचट, आमच्या घरची ब्रेड विनर आणि पैसे कमावण्याची मुख्य जबाबदारी सुनंदावर आहे, हे न लाजता सांगणारा नवरा, मुलींसाठी घरात लहानपणी त्यांच्या उंचीचे स्विच बोर्डस करून त्यांना पाहिजे तितक्या वेळा बटणं चालू बंद करायला परवानगी देणारा बाबा, वेताळ टेकडीवर गेल्यावर 'बांगड्या वाजवल्या की वेताळ येतो' अश्या अंधश्रद्धेला भीक न घालता मुद्दाम बांगड्या वाजवणाऱ्या मुक्ता-यशो,  लहानपणी घरात येणाऱ्या घरकामगार तायांच्या भाषेत अशुद्ध ग्रामीण ढंगाचे मराठी मुलींना बोलायची मुभा देणारे, त्यांना समाज कळावा म्हणून मुद्दाम मनपाच्या शाळेत घालणारे, ,प्रत्येक वाढदिवसाला मुलींना एकमेकांना पत्र देणारे, आपण काय काम करतो ते मुलांशी रोज तासतासभर शेअर करणारे, मजा मस्ती करणारे अनिल अवचट आणि सुनंदा अवचट हे खरोखरीचे सुजाण आई बाप 💝

बाबांचे आणि त्यांच्या मुलींनी मिळून लिहिलेले सगळ्यात आवडते अतिशय छोटेखानी पुस्तक म्हणजे #सुनंदाला_आठवताना . पुस्तकातुन आपल्याला डॉ. अवचट कळले आहेत, पण डॉ. सुनंदा ही काय अचाट, अफाट बाई होती हे जाणून घ्यायला हे पुस्तक/ पुस्तिका मुळातून वाचायला हवी. अतिशय जीवनलालसेने भरभरून जगणाऱ्या डॉ. सुनंदा, अतिशय शिस्तीची गृहिणी, नवऱ्याला खोड्या काढून नकला करून चिडवणारी मैत्रीण, मेंटल हॉस्पिटलमधल्या पेशंटचे वाढदिवस शोधून साजरे करणारी आणि त्यांना फुलं देणारी माया करणारी आणि "पेशंट काय फक्त औषधानेच बरा होतो का? "असं विचारणारी संवेदनशील डॉक्टर , ही कथा आहे 'मुक्तांगण' मध्ये हेरखातं ठेवून ब्राऊन शुगरच्या पुड्या बरोबर पकडणार्या 'चतुर' व्यवस्थापकाची, स्वतःच्या पर्समध्ये नेलकटर ठेवून दिसेल त्या मुलांची नखं काढणाऱ्या डॉक्टरीण बाईची, कॅन्सर झालेला असूनही सतत उत्साहानं कामात राहणाऱ्या बाईची, केमोथेरपी चालू असताना त्या खोलीत सरोदची कॅसेट आणि ताजी फुले ठेवणाऱ्या नवऱ्याची, मुलींसाठी कपडे शिवणाऱ्या आणि वाढदिवसाला आवर्जून पत्र लिहिणाऱ्या 'वेड्या' पण शिस्तशीर आईची. पुस्तकाचं नाव आहे - सुनंदाला आठवताना . पुस्तक मुळातून वाचा, मस्ट आहे ते.

एक सांगायलाच हवं, डॉ. #सुनंदा_अवचट या अतिशय सक्षम आणि संवेदनशील Psychiatrist बाईंनी सर्वात प्रथम दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्यांच्या मैत्रिणीच्या तरुण मुलाला , स्वतःची उपचारपद्धती वापरून बरं केलं. मग पु ल देशपांडे आणि सुनीता बाईंनी मोठी देणगी दिल्यावर '#मुक्तांगण' ही व्यसनमुक्ती साठीची पायोनिअर संस्था पुण्यात सुरू झाली. अर्थात या साठीची संस्था नोंदणी, आर्थिक व्यवहार, ट्रस्टी नेमणे अशी सगळी कामं करण्यात आणि व्यसनी मित्रांना माणसात आणण्यात अनिल अवचट यांनी मोलाची मदत केलीच. कित्येकांचे संसार वाचवले, त्यांना नवं आयुष्य मिळवून दिलं, हे डोंगराएव्हढं काम आजही तितक्याच कार्यक्षमतेने चालू आहे. यात बाबांचं नक्कीच श्रेय आहे, पण या संस्थेची संस्थापक म्हणून श्रेय डॉ.सुनंदा अवचट यांचंच. या पुस्तकात सुद्धा तसंच नमूद केलं आहे, आणि एकदा इंडियन मर्चंट ऑफ कॉमर्स चा पुरस्कार मुक्तांगण ला मिळाला तेंव्हा ते बाबांच्या नावावर जाहीर झालं, तेंव्हा बाबा लिहितात " मी वैतागलो आणि शरमलो देखील, हे काम सुनंदाचे असून मला का बक्षीस?" अर्थात स्टेजवर जाण्याचा फार उत्साह नसणाऱ्या डॉ. सुनंदा यांचा त्यावर आक्षेप नसे.. पण चार दिवसांपूर्वी बाबा गेल्यापासून अनेक चॅनेलवाले, पेपरवाले त्यांना बिनधास्त मुक्तांगणचे संस्थापक संचालक म्हणतायेत, मला खात्री आहे हे बाबांना पण नसतं आवडलं. आणि कितीही घासून गुळगुळीत झालेलं वाक्य म्हणायचं तर डॉ.सुनंदा यांच्या सारखी धीराची आणि कर्तृत्त्ववान जोडीदार, होती म्हणून महाराष्ट्राला डॉ.अनिल अवचट मिळाले.

त्यांचा प्रभाव एवढा होता की ते 'युक्रांद' कार्यकर्ते होते हे कळल्यावर, ते काम आवडल्यावर मी सुद्धा पुण्यात आल्यावर काही काळ 'युक्रांद' ची सक्रिय कार्यकर्ती होते. त्यांच्या मुळेच डॉ. कुमार सप्तर्षी यांची आणि कामाची ओळख झाली.एक उदारमतवादी राजकीय विचारसरणी तयार झाली.

बाकी आयुष्याच्या सगळ्या बाबतीत रमणारे, बासरी वाजवणारे, ओरिगामी करणारे, काष्ठशिल्प करणारे, स्वयंपाकात अत्यंत रुची बाळगणारे, वेगवेगळ्या वड्या उत्तम करणारे आणि मुख्य म्हणजे कुणाच्याही गुणांचे हात न राखता कौतुक करणारे 'बाबा' फार फार जवळचे आहेत.

तुम्ही आहात, असणार हे गृहितच धरलं होतं आम्ही! त्यामुळे श्रद्धांजली वगैरे म्हणवण्याचे धाडस करवत नाही.. एक बरं वाटतंय तुम्ही तुमच्या लाडक्या 'शोनाड' ला भेटू शकाल आता. बाकी पुस्तकातून तुम्ही कायम आमच्या जवळ असणार आहात बाबा, तिथून तुम्हाला कोणीच दूर  नाही करू शकत!

तुमच्या आप्तांना, भल्या मोठ्या विस्तारलेल्या परिवाराला Mukta Puntambekar  ताई, Yashoda Wakankar यांना या दुःखातून सावरायचे बळ मिळो. हे फार अवघड असणार, असा लाडका 'बाबा' गमावणे त्यांच्यासाठी 😢


जिथं जाल तिथं कायम खुश असा, #बाबा 💝


- स्नेहल बनसोडे शेलुडकर.

Friday, August 11, 2017

The Beautiful Gym Life


You love your workout. The clock tickles at your regular workout time & if you are not at Gym you're feeling like cheating. You love that atmosphere, Your pre & post workout stretches, gives you boost. You don't belong whether the music is there or not you just want to follow your schedule. You love to experiment, You want to increase your weights, but you don't want to do this with the wrong form at the same time. You don't need a trainer to count your sets. It is a meditation for you. You don't even remember your worries, Office deadlines or any disputes of the personal life while lifting weights.
You don't like bumping the dumbbells on the flooring of the gym by others as Dumbbells are your best friends. You want to treat them with dignity. You are willing to guide a new comer with a proper form of Calves or dead lift. But you don't want much babbling while your workout. You just want to focus. You love to be guided on the correct form by a trainer or senior member. You want to hold your plank more than the last set. You are surrounded by sounds of pushing oneself to the next level, ''One more set to go, Yes, you can do it Champ''.
You adore Gym mates, who have owned their fitness & still going strong. You just want to be like them. And by the meantime some unknown Gym mate rushes to you and says 'Wow, you have lost so much weight, that too in small period' Or Your gym trainer asks you 'Madam, I want your after & Before photos, You have done well' You just Smile & Thank them And while gulping your favorite Whey you tell him " After some time sir, अभी तो बस शुरुवात है!"

Saturday, March 16, 2013

गंधवेड..

मला ज्ञानेंद्रियं ही फक्त ज्ञानेंद्रियं वाटतच नाहीत,
कधीच,
मला ती रसनेंद्रियं वाटतात...
आयुष्यावर प्रेम करायला भाग पाडणारी...
तर त्यात आपली सर्वाधिक गट्टी आहे ती 'घ्राणेंद्रिया'शी म्हणजेच नाकाशी...
मी गंधांवर जाम फिदा आहे,
नाक उंचावून मनापासून खोलवर तो गंध साठवायला आतुरणारी...
ते प्रत्येक वेळी 'सो कॉल्ड' सुगंध नसतात,
वासच असतात साधेसे,
पण ते अनुभवल्यावर काय वाटतं ते शब्दात नाही मांडता येत....

जसं की गंध आमच्या सोलापूरच्या 'हुतात्मा स्मृती मंदिर'चा तो गंध आणि 'हुतात्मा' हे समीकरण डोक्यात इतकं पक्कं आहे की तो वास नाही आला तर मी 'हुतात्मा'मध्ये आलीय असं वाटतच नाही....

दुसरा वास धुराचा म्हणजे 'I am crazy for Smoke.' असं म्हटलं तरी चालेल इतका आवडतो धूर...
लाकडं, पालापाचोळा, कागद, फटाके पेटवल्यावर येणारा, चुलीतून येणारा धूर अगदी सगळं-सगळं-
equal to heaven.(Please note- सिगरेटचा धूर आवडत नाही)

तिसरा अतिप्रिय गंध अर्थातच सोनचाफ्याचा- हे दैवी फूल आहे आणि मी त्याच्या गळ्यापर्यंत प्रेमात आहे.
चौथा वास मृदगंधाचा- उन्हानं रापलेल्या कोरड्याठाक भुईवर जेव्हा पावसाचा थेंब पडतो, किंवा आपण सडा टाकतो तेव्हा जमिनीच्या पोटातनं जो तृप्तीचा हुंकार येतो...तो मृदगंध कुणाला आवडत नसेल?

पाचवा वास आमच्या ऑफिसजवळच्या उदबत्तीच्या दुकानाचा....रोज घरी परतताना मुद्दाम फुटपाथवर चढून,अस्मादिक त्या दुकानासमोरुन हळू-हळू चालत तो वास साठवून घेतात... :D

सहावा वास - शिकेकाईचा, विकतची नव्हे, घरी तयार केलेली दळलेली , जाडसर- शिकेकाई, उटणं, फक्त दिवाळीतच ज्यांचा वास आवडतो ते सुगंधी तेल, मोती, म्हैसूर सँडल साबण, बाकी जगातल्या कुठल्याही सेंट-डिओचे वास आवडत नसले तरी बाबा वापरतात ते सेंट- त्याचा वास आपल्या आवडीचाच...

डांबर गोळ्या आठवतात कुणाला? आपल्याला लै आवडतो त्याचा वास...रॉकेल, फिनेल, पेट्रोलचा वासही आवडता...

वास जुन्या कपड्यांचा, वास आजीची आठवण करुन देणाऱ्या जुन्या गोधडीचा, जुन्या पुस्तकांचा, नव्या-कोऱ्या वह्या-पुस्तकांचाही, सिंथॉलचा वास आणि बार्शीचं माझ्या अप्पा मामाचं घर हे समीकरणही डोक्यात पक्कं...वास कापुराचा, वास वाळ्याचा , कुलर नुकताच सुरु केल्यानंतर येणारा विशिष्ट वास...वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा , वास मोगऱ्याचं फूल माठात टाकलेल्या पाण्याचा.....

स्वयंपाकाशी निगडित वासांची किती वर्णनं करावीत- गॅसवरच्या भाकरीचा वेगळा, पोळीचा वेगळा, चुलीवरच्या खरपूस भाकरीचा, थालिपीठाचा वेगळा,मसालेदार वांग्याच्या भाजीचा, वास तेलात आत्महत्या करणाऱ्या आलं-लसूण-कोथिंबीर-कडिपत्त्याचा, ताज्या दळलेल्या कॉफी बीन्सचा, पाकिट फोडून नुकत्याच बाहेर काढलेल्या चहापावडरचा, इंद्रायणी भाताचा, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा,गरम भाजलेल्या कणसाचा,  ताज्या पुदिना- लिंबाचा, कढवलेल्या खमंग तुपाचा, आईनं तुपावर भाजलेल्या बडिशेपेचा, खमंग बेसनाच्या लाडूचा, आमच्या सोलापुरातील 'अय्यंगार बेकरी' च्या गरमा-गरम ताज्या खारीचा...(बऱ्याचदा मी कॉर्नरवर गाडी थांबवून तो वास साठवून घेते..गरमागरम पिळ खारी ही तिथली स्पेशालिटी...असो.)

नुसत्या उदबत्त्यांच्याच वासांच्या सेक्शनचे माझ्या डोक्यात हजार कप्पे आहेत...आमची फेव्हरेट पंढरपूरची ओली मसालावाली 'डेक्कन क्वीन' अगरबत्ती...सोलापूरच्या 'पुणेकर कामठे रसपानगृहा'त बाबा जातात ते उसाचा रस प्यायला आणि मी तिथल्या खास उदबत्तीचा वास घ्यायला..कधी तरी अचानक कुठून तरी वास येतो..तो असतो डिट्टो आमच्या आहेरगावच्या अंधाऱ्या देवघरात आजीनं लावलेल्या उदबत्तीचा...वास धूपाचा-उदाचा, मुसलमान फकीर जाळतात तो स्पेशल धूप वेगळाच...

गंधवृत्ती जागृत असल्या की जसे उत्तम वास लगेच जाणवतात तसंच दुर्गंधांचा त्रासही लगेच होतो...भरभरुन वाहणाऱ्या कचरापेट्या, गटारं, खिडक्या-दरवाजे बंद करुन ठेवणारी कोंदट घरं...मुळ्या-शेपूचा उग्र वास, अंडा आम्लेट, माशांच्या टोपलीचा मला सहन न होणारा वास...यड्यासारखे उग्र वासाचे डिओ-स्प्रे-सेंट फवारणारे लोक, सार्वजनिक जागी सिगरेटी फुकून दुसऱ्याचा जीव नकोसा करणारे लोक नकोसे होतात...जाऊ दे वाईट आठवणी नको काढायला...

गंधांच्या लिंक फार स्ट्राँग असतात...बऱ्याचदा त्या आठवणी घेऊनच येतात....

Thursday, January 31, 2013

तरीही येतो वास फुलांना.....

  तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असता ते तुमचे वडील तुमच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर कारस्थान रचून बेछूट गोळीबारात मारले जातात...तुमची आत्या आणि काकाच त्या देशाचं सरकार चालवत असतात.. या गोळीबारापाठीमागे तेच आहेत हे ही तुम्हांला माहीत असतं..तुम्ही काहीच करु शकत नाही...तुमच्या वडिलांचे मारेकरी निर्दोष सुटतात..इतकंच काय त्यांना देशाची सेवा केल्याचं शौर्यपदकही दिलं जातं ...तुम्ही काहीच करु शकत नाही...

फ्लॅशबॅक-
शाहनवाझ भुट्टो आपल्या मुलाला सांगतात ''बाळा राजकारण हे कविता लिहिण्यासारखं किंवा संगीताची रचना करण्यासारखं आहे..'' वडिलांच्या प्रभावातला झुल्फी आपली सरंजामदारी विसरुन चक्क मार्क्सच्या प्रेमात पडतो..स्वत:चं सरकार आल्यावर जमीनसुधारणा कार्यक्रम राबवतो आणि बरीचशी जमीन दानही करतो...हे झुल्फिकार भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक..पुरोगामी आणि उदारमतवादी असलेले...

कट टू-
झुल्फिकार भुट्टोंचा मुलगा मूर्तझा..वडिलांप्रमाणेच चे गव्हेरानं भारलेला, माणसाला माणूस समजणारा देश उभारण्याचं स्वप्न पाहणारा...तो शिक्षणासाठी परदेशी असताना देशांतर्गत बंडाळ्यांच्या दरम्यान त्याच्या वडिलांना झुल्फिकार यांना, झिया यांच्या राजवटीत फाशीवर चढवले जाते...त्यांच्या देहाचं दफन होतं..आणि त्यानंतरच झुल्फिकार यांना फाशी दिल्याचं झिया जाहीर करतात...वडिलांच्या हत्येनं मूर्तझा कोलमडतो...इकडे पाकिस्तानात झिया-उल-हक यांची जुलूमी हुकूमशाही टोकाला पोहोचते...कुठलाही मानवी हक्क पायदळी तुडलण्याचं ते बाकी ठेवत नाहीत...रमजानच्या महिन्यात प्रत्येकानं उपवास करावाच म्हणून सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थाच बंद ठेवण्यात येते...त्यामुळे प्रत्येकाला सक्तीचा उपवास घडायचा...शिवाय स्त्रियांसाठी त्यांनी 'हुदूद'कायदा जारी केलेला, ज्याअंतर्गत बलात्कारात बळी पडलेल्या स्त्रीलाच गुन्हेगार मानलं जाई...आणि यासाठी शिक्षा होती दगडांनी ठेचून मारण्याची ...वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मूर्तझा 'अल झुल्फिकार' संघटनेची स्थापना करतो...इकडे सत्ताकांक्षी असणारी बेनझीर सहानुभूतीच्या जोरावर पाकिस्तान कह्यात घेते...तिचा नवरा झरदारी आणि तिला पाकवर एकहाती सत्ता हवी असते..त्यात तिला कोणीच वाटेकरी नको असतो...तिला स्वत:च्या सख्ख्या भावाचीही भीती वाटायला लागते...इतकी की पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतलेल्या भावाला ती पक्षाची उमेदवारीही नाकारते...अर्थात मूर्तझा अपक्ष निवडणूक लढवतो आणि जिंकूनही येतो...

कट टू-
पाकमध्ये भ्रष्टाचारासोबतच हिंसाचारही टोकाला पोहोचतो..बेनझीरच्या आदेशानं 'ऑपरेशन क्लीन अप'मोहीम सुरु होते, ज्याचा सूत्रधार असतो 'तालिबानी ही माझी मुलं आहेत'असं म्हणणारा नसीरुल्लाह बाबर ..1994-95 या दोन वर्षांत तब्बल 2095 लोक मारले जातात...आपल्या विरोधकांना आणि नकोशा लोकांना संपवण्याचा बेनझीरचा हा डाव होता...बीबीसीनं केलेल्या शोधमोहीमेत या लोकांना लोखंडी सळयांचे चटके, ब्लेड आणिचाकूचे वार असा अनन्वित अत्याचार करुन मारल्याचं सिद्ध झालंय...

कट टू-
या सगळ्या प्रकरणाचा कळसाध्याय अर्थातच मूर्तझाची हत्या...70 क्लिफ्टन परिसरातले दिवे मुद्दा्म घालवण्यात आले आणि मूर्तझाच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला...मूर्तझा तरीही जिवंत होता...त्याला दवाखान्यात घेऊन जातोय असं सांगून कारमध्ये बसवण्यात येतं आणि जबड्याच्या जवळून शेवटची गोळी झा़डण्यात येते..इतकंच नाही तर त्याला उपचारच मिळू नयेत म्हणून ज्या ठिकाणी आयसीयू आणि शस्त्रक्रियेची व्यवस्थाच नाहीए अशा ठिकाणी त्याला 'टाकण्यात' येतं..मूर्तझाच्या ताफ्यातील सहा जणांनाही असंच ठार केलं जातं....त्यानंतर 2009 साली सर्व आरोपी पोलिसांची निर्दोष सुटका होते...हत्या प्रकरणातील एका पोलीस अधिकाऱ्याला तर 'हिलाल-ए-इम्तियाज' हे देशसेवेचं पदक देऊन गौरवण्यात येतं..मूर्तझाची आई नुसरत भ्रमिष्ट होते...आपल्याच पोटच्या दोन मुलांमधली ही जीवघेणी लढाई बघून...बेनझीर आईला जबरदस्तीनं आपल्या घरी घेऊन जाते....

पुस्तकाचं नाव  सार्थ करणारी ही भुट्टोंची रक्तलांच्छित कहाणी...वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या फातिमानं लिहिलेली....पण या गोष्टीत फक्त राजकराणच नाही तर मानवी भाव-भावनांचे अनेक कंगोरे आहेत...आपल्या मुलाला लहानपणी थोबाडीत मारल्यानं पत्रातून त्याची मानपासून माफी मागणारे झुल्फिकार भुट्टो आहेत....मूर्तझाच्या आयुष्यातील तीन स्त्रिया आहेत...त्यात जिच्या आठवणींशिवाय मूर्तझाचा एक क्षणही जायचा नाही अशी ग्रीक डेला आहे, आणि मूर्तझाचा संसार सावरणारी लेबनॉनची घिनवाही आहे...मुलीसोबत मस्ती करणारे, तिला स्वीमिंगपूलमध्ये ढकलणारे 'फाती'चे पप्पा आहेत...बाबांचा हात फ्रॅक्चर झाल्यावर स्वत:चाही हात कापडी पट्टीनं बांधून ठेवणारी वेडी 'फाती' आहे...नवा पक्ष स्थापन करताना पक्षाच्या जाहीरनाम्याची पहिली प्रत मुलीला वाचायला देणारे, 13 व्या वर्षी तिनं सांगितलेल्या स्त्रियांना गर्भपाताचा आणि गर्भनिरोधनाचा हक्क या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश करण्याचं आश्वासन देणारे उदारमतवादी वडील मूर्तझा भुट्टो आहेत.

या पुस्तकानं मला काय दिलं? राजकारण अपरिहार्य असतंच तरीही अदम्य जिज्ञासेनं भरभरुन जगणारी माणसं असतात..दुसरीकडे भारताला आता हुकूमशाहीच हवी, बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्या अश्या आततायी मागण्या करणाऱ्या आपल्या काही देशवासियांच्या मागण्या केवळ भावनेच्या भरातून आलेल्या आहेत...कारण ''जाहीर फाशी किंवा चाबकाच्या फटक्यांमुळे न्यायाची पुनर्स्थापना होत नाही, तर उलट सत्तेला मात्र अधिकच बळ मिळतं '' हे महत्त्वाचं तत्त्व सांगणाऱ्या फ्रेंच तत्त्वज्ञ फौकोट यांच्याळशी ओळख करुन दिली...गेल्या चार महिन्यात म्यानमार आणि पाकिस्तानविषयी वाचताना आपण किती भाग्यवान आहोत आणि आपली लोकशाही किती महत्त्वाची आहे हे पुन:पुन्हा जाणवत राहिलं...आणि अश्या आततायी मागण्या करणाऱ्या लोकांना ''बाबांनो, आपल्याकडे काय आहे त्याची किंमत ओळखा आणि ते प्राणपणानं जपा, कारण आपल्याला जे मिळालंय त्यासाठी लोक प्राणांची बाजी लावतायत '' हे एकदा हात जोडून सांगावं असं वाटायला लागलं....

ता.क- फातिमा भुट्टो या मुक्त पत्रकार (फ्री लान्स जर्नालिस्ट) आहेत...'द डेलीबीस्ट', 'न्यू स्टेटसमन'मधून त्यांचं लिखाण प्रसिद्ध होतं.

पुस्तकाचं नाव-
भुट्टो- एक रक्तलांच्छित कहाणी- फातिमा भुट्टो, अनुवाद- चिंतामणी भिडे
प्रकाशक- चिनार पब्लिशर्स, किंमत 400 रु.
(Sarhad Research Centre for Conflict Resolution & Peace)

मूळ इंग्रजी पुस्तक-
Songs of Blood & Sword- Fatima Bhutto, Vintage Books




Sunday, July 8, 2012

सबिना आणि 'जिलबी'पुराण


तुम्हांला जिलबी खायला आवडते? किंवा तुम्हांला वेगवेगळ्या रेस्टॉरंटसमध्ये जाऊन खादाडी करायला आवडते का? किंवा तुम्हांला इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे का ? या पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल तर तुम्हांला सबिना सेहगल सैकिया यांच्याविषयी जाणून घ्यायलाच हवं......सबिना सेहगल या भारतातल्या अग्रगण्य आणि सर्वोत्तम फूड क्रिटीक मानल्या जातात.....सबिना 20 वर्षं टाईम्स समूहामध्ये होत्या.....दिल्ली टाइम्स आणि संडे टाइम्सचं संपादकपदही त्यांनी भूषवलं...’TOI Good Eating Guide’  या पुस्ताकच्या त्या लेखिका..पदार्थांविषयी आणि रेस्तरांविषयी वृत्तपत्रातून परीक्षणे लिहिणे ही पद्धत भारतात सबिना यांनीच चालू केल्याचं मानले जातं......इतकंच नाही तर पेज थ्री जर्नालिझम हा बरावाईट प्रकारही सबिनांनीच सुरु केला....दिल्ली टाइम्स च्या त्या संपादक झाल्यावर पानं कशी भरायची आणि खप कसा वाढवायचा असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर होता......मुंबईत चटपट्या, मसालेदार बातम्यांसाठी बॉलिवूड आहे...पण दिल्लीत अश्या बातम्या कुठून आणायच्या या प्रश्नाचं उत्तर सबिना यांनी शोधून काढलं....दिल्लीतल्या उद्योगपती आणि नेत्यांच्या घरच्या पार्ट्यांचा मसालेदार वृत्तांत त्यांनी वृत्तपत्रामध्ये छापायला सुरुवात केली आणि जन्म झाला- पेज थ्रीचा!! ’मेन कोर्स नावाचं सबिनांचं सदर अतिशय प्रसिद्ध होतं....ज्यातून त्या रेस्तरॉंचं परीक्षण करायच्या....त्यांच्या कौतुकाचे शब्द आपल्या वाट्यास यावेत यासाठी उत्तमोत्तम रेस्तरा धडपडायचे...त्या आपल्या लिखाणाबाबत अतिशय काटेकोर होत्या ...जर एखादं रेस्टॉरंट आवडलं नाही तर त्या कठोर शब्दात त्याच्यावर ताशेरे ओढायच्या...आणि या उलट जर एखादं रेस्तरा किंवा धाबा जरी चांगला असेल तर त्याची तारिफ करताना त्या थकायच्या नाहीत....त्या शेफचं आणि रेस्तराच्या अॅम्बियन्सचं हातचं न राखता कौतुक करायच्या......सबिना म्हणत ‘’ माझा वाचक माझ्या शब्दावर विसंबून पैसे खर्च करतो त्याचा विश्वासघात मी करणार नाही, दर्जा सांभाळणं हे माझं कर्तव्यच आहे‘’
सबिनांचा खाद्यपदार्थांबाबत अतिशय दांडगा अभ्यास होता..त्यातील काही नमुनादाखल किस्से -
‘’आपल्या सर्वांच्या लाडक्या आईस्क्रीम कोनचा जन्म कसा झाला याची अतिशय इंटरेस्टिंग कथाही सबिनांनीच सांगितली आहे....जिलेबी हा पदार्थ मूळचा इराकमधल्या सिरियाचा...त्याचं मूळ नाव ‘Zalabia’ ..अमेरिकेतल्या सेंट लुई प्रांतात एका औद्योगिक प्रदर्शनात सिरियाचा अर्नेस्ट हाम्वी झलाबिया करुन विकत होता......झलाबिया म्हणजे मैद्याच्या आंबवलेल्या पिठात अंडी आणि मध घालून केलेली कुरकुरीत जाळीदार बिस्कीटं....हाम्वीचे झलाबिया फारसे विकले जात नव्हते...उन्हाळा असल्याने त्याच्या शेजाऱ्याच्या स्टॉलवरचं आईस्क्रीम मात्र तुफान विकलं जात होतं......अचानक हाम्वीच्या लक्षात आलं की आपला स्टॉलधारक शेजारी थोडा संकटात आहे.....झालं असं की त्याच्याजवळच्या आईस्क्रीमच्या ताटल्याच संपल्या, ग्राहकांची मागणी मात्र वाढतच होते...आणि मग हाम्वीने शेजाऱ्याला मदत करण्यासाठी शक्कल लढवली....त्यानं आपल्या झलाबिया भाजण्याआधी त्यांना शंकूंचा आकार दिला.....आणि जन्म झाला आईस्क्रीमच्या कोनाचा...!!! या झलाबियाचा महाराष्ट्रीय अवतार म्हणजे, जिलेबी...समर्थ रामदास स्वामींचे शिष्य रघुनाथ नवहस्त यांच्या 17 व्या शतकातील भोजनकुतूहुल या ग्रंथात जलवल्लिकेचा आणि कुण्डलिकेचा (संस्कृत नाव) म्हणजेच जिलबीचा उल्लेख येतो.....त्याहीअगोदर 15 व्या शतकात जिनासुराच्या कथेत जिलबीचा उल्लेख आढळतो....त्यामुळे जिलेबी ही महाराष्ट्रातूनच भारतभर गेली असं मानण्यात येतं....मूळच्या झलाबियात बदल होत गेला....मध , अंडी वगळून साखरेचा पाक आला, भाजण्याच्या ऐवजी तळण्याची शक्कल वापरली आणि तयार झाली आपली जिलेबी.
खाद्यपदार्थांच्या इतिहासाची असंख्य पुस्तकं जगभरात आहेत.....त्यापैकी खाद्यपदार्थांचं बायबल मानलं जावं असं पुस्तक म्हणजे अरबी भाषेतलं अल-किताब-अल-तबिख’.. अल वराकच्या या पुस्तकात 132 प्रकरणं आहेत....गद्य-पद्य अश्या वेगेवगळ्या प्रारुपात पदार्थांची माहिती आहे.....खाण्यापिण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या इराकच्या अब्बासिद घराण्यानं हे पुस्तक लिहवून घेतलं...अब्बासिदांची सत्ता हा इस्लामी सत्तेचा सुवर्णकाळ मानण्यात येतो.....कागदनिर्मिती यांच्याच काळात झाली, अरेबियन नाईटस आणि लैला मजनूच्या कथाही अब्बासिदांच्या कारकिर्दीतल्या......बीजगणित म्हणजेच अलजेब्रावरचं जगातलं पहिलं पुस्तरही यांच्याच कारकिर्दीतलं...झलाबियाचा पहिला उल्लेखही या अल- किताब मधलाच....हे घराणंच खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध...हारुन अल रशीद हा सर्वात कर्तुत्त्ववान खलिफा...यांच्या कुळातील सर्व पुरुषांना स्वत: स्वयंपाक करता येई.(कारण भाउबंदकीमुळे कधीही वाळवंटातून पळून जावं लागलं तर जीव वाचवता यावा हा उद्देश!) हारुनच्या कारकिर्दीत गावागावातून पाककृतीच्या स्पर्धा व्हायच्या....दरबारातही सतत प्रयोग होत असायचे....या प्रयोगातूनच जन्मलं आपलं वांग्याचं भरीत.....झालं असं की हारुनच्या एका मुलाला वांगी भयंकर आवडायची, एके दिवशी त्याने वांगी भाजून नवीनच पदार्थ तयार केला आणि त्याला नाव दिलं बुर्रान या आपल्या लाडक्या पत्नीचं....पदार्थाचं नाव पडलं बुर्रानियत....ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन शब्द बनला भरीत.....’’

सबिनांनी सांगितलेले असे कितीतरी किस्से...सबिनांचं जितकं प्रेम खाण्यावर होतं तितकंच प्रेम गाण्यावरही होतं....सबिना अतिशय लिबरल होत्या.... देश- धर्म-भाषाचं बंधन तोडण्याची ताकद खाण्यात आणि संगीतात आहे असं त्या मानत....कायम माणुसकीचा पुरस्कार करणाऱ्या सबिनांना दुर्देवानं मरण मात्र आलं ते २६/११ च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात......मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये त्या आलेल्या होत्या......ताज व्यवस्थापनानं त्यांना आमंत्रित केलं होतं.....Travel & Living च्या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट शेफची निवड करण्यासाठी त्या खास आमंत्रित होत्या...आणि दुर्देवाने ताजवर अतिरेक्यांचा हल्ला झाला.....आणि सबिना सेहगल भारतीय खाद्यसंस्कृतीचा इतिहास घेऊन कायमच्या आपल्यातून निघून गेल्य़ा....(असं म्हणतात की त्याचवेळी सबिना या अतिरेकी असल्याचा जावईशोधही पत्रकारांनी लावला...हातात बूम असणाऱ्यांनी तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले....आणि आपल्या देशात सबिना हे नाव असणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं)

विशेष सूचना ही सर्व माहिती मी जमवलेली नाही....माहेर या मासिकात जानेवारी पासून खाद्यपरंपरांवरचं एक विशेष सदर सुरु झालंय....चिन्मय दामले नावाचा एक बापमाणूस, अतिशय सुंदर लेखमाला चालवतोय....त्यातल्याच एका लेखाचा हा सारांश...जिज्ञासूंनी, रसिकांनी सदर मुळातून वाचावं...मला शेअर केल्याशिवाय अजिबात राहावलं नाही....एक चांगला लेख वाचल्यावर जो आनंद होतो, तसा पुरेपुर आनंद मला दामलेंचं लेख देतायत...

Friday, September 23, 2011

मी पाहिलेली छटाक मुंबई..

मी पाहिलेली छटाक मुंबई
मोठ्या मनाच्या थोड्याच माणसांची,
प्रचंड प्रॅक्टिकल आणि उतू जाणाऱ्या श्रीमंतीची,
लिटरली गगनचुंबी टॉवर्सची आणि क्लासिक आर्किटेक्चरल इमारतींची,
चाळींची, वन रुम किचनमधल्या दिमाखदारपणाची आणि
फुटपाथवर झोपणाऱ्या ,एक घोंगडं-ताट-तांब्या एवढाच संसार असणाऱ्या म्हातार आजीचीही,
9.53 वगैरे मला कधीच न पकडता येणाऱ्या लोकल्सची,
मुंबईत चहा चक्क पार्सल मिळतो आणि शहाळंही...!!
लोक समोसा-पाव, भजी-पाव खातात
सरदारच्या पावभाजीसाठी, प्रकाशच्या वड्यासाठी आणि भरतक्षेत्रमधल्या साड्यांसाठी चक्क रांगा लावतात.
मुंबईत गोष्ट सुंदर, भारी, ग्रेट नसते तर ती 'सेक्सी' असते..
मुंबई कष्टकऱ्यांची-
रेल्वे लाईनच्या मध्ये राखलेल्या छोट्या तुकड्यांवर चक्क भाज्या पिकवणाऱ्यांची,
रानभेंडी, रेन ट्री, पेल्टाफोरम आणि मध्येच वाकलेल्या केळींचीही....
मुंबई घाणेरड्या हवामानाची, तिखटा-हळदीला बुरशी लागण्याची,
धाडकन अचानक कोसळणाऱ्या पावसाची
मग हापिसात थ्री-फोर्थ पँटी घालण्याच्या फॅशनीची
आणि त्या पावसातल्या वाफाळणाऱ्या मॅगीची
कायम शेवाळलेल्या भिंतींची..
आणि मला आवडणाऱ्या व्हायब्रंट कलर्सनी रंगवलेल्या
'हम पंछी इक तार के' वगैरे लिहिलेल्या क्रिएटिव्ह भिंतींचीही !
(बहुधा लोकांनी लघवी करु नये म्हणून...)

मुंबईचे सगळे आमदार, नगरसेवक 'कार्यसम्राट' असतात,
म्हणूनच कचराकुंड्या भरभरुन वाहतात, गटारी तुंबतात, माणसं मरतात
मुंबईतली माणसं कायम पैश्यांविषयी बोलतात
आणि सोनचाफ्याची फुलं घेताना मात्र भाव करतात...

मुंबई प्रचंड व्हरायटीची, सोयी सुविधांच्या सुकाळाची
साध्या मिरच्यासुद्धा सहा-सात प्रकारच्या मिळण्याची,
माझ्यासाठी मुंबई म्हणजे,
प्रवासाचं कधीच न वाटणारं 'डेस्टिनेशन'
कामाच्या ठिकाणी सुमारांची सद्दी,
अर्ध्या हळकुंडानं जेजुरी झालेल्या माणसांची गर्दी,
च्यायला 'क' च्या बाराखडीनं माझ्या डोक्याची होणारी मंडई,
शीण घालवणारा लाडका समुद्र,
कोपऱ्यावरचा चाफा पाहून कुणाची तरी आठवण येणं.......
कधीच वेळेवर न होणारं जेवण,
ड्यूटी संपवून भाग भाग डी के बोस करत गाठावी लागणारी लायब्ररी,
अंगणात गेल्यासारखी दर आठवड्याची दादरची फेरी,
फुटाणे खाउन लाडावलेली कबुतरं आणि कर्कश्श कावळे,
मुंबई विझलेल्या गिरण्यांच्या चिमण्यांची,

मुंबई म्हणजे भर समुद्रात उभी करुन ठेवलेली वरळी - वांद्रे सी लिंक ची सतार,
मुंबई भिकबाळी घातलेल्या गणपती बाप्पाची,
देवनारच्या TISS मधल्या दृष्ट लागण्याजोग्या शांततेची,
मुंबई जिथं बसमधल्या लेडिज सीटवर पुरुष कधीच बसत नाहीत...
मुंबई ट्रेनमध्ये भजनं म्हणणाऱ्या, गणपती बसवणाऱ्या , गटारी साजरी करणाऱ्या उत्साही जनतेची,
मुंबई साईबाबांच्या भक्तांची,
मुंबई घरं नसलेल्या कित्येकांची,
वाहणाऱ्या कचराकुंडीत उभारुन पाव शोधणाऱ्या पोराची,
रक्ताळलेल्या माथ्याचं पोर घेउन स्टेशन-स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईची
ताई, घरची आठवण येतीय म्हणून भर ट्रेनमध्ये माझ्यासमोर रडणाऱ्या बांगड्या विकणाऱ्या -बोटभर चिंधीची
आणि काहीच न करु शकणाऱ्या हताश माझीही.......







Monday, March 14, 2011

Love each other or perish - W.H.Auden.

''जो पर्यंत आपण इतरांवर प्रेम करत असतो आणि ती प्रेमभावना आपल्या मनात ताजी असते, तोपर्यंत आपण मेलो तरीही त्यांच्या पासून दूर जाऊ शकत नाही. आपण निर्माण केलेलं प्रेम त्यांच्या सोबत राहतंच . आपल्या आठवणी राहतात. आपण जगताना ज्यांना -ज्यांना प्रेमळ स्पर्श केला, पोषण केलं, शिकवलं, त्या प्रत्येकाच्या हृद्यात आपलं अस्तित्त्व असतं.''
- from Tuesdays with Morrie - Mitch Albom
यानंतर मी फक्त 'आमेन' म्हणू इच्छिते.