Sunday, November 14, 2010

तुम्हांला नाहीच जमायचं.....!

परवा दिवशी पिठल्यासाठी डाळीचं पीठ कालवायला घेतलं. अचानक आवाज आला, ''...तुम्हांला नाहीच जमायचं!'' मला काही कळेचना आवाज कुठुन येतोय ते ! कारण रुममध्ये मी एकटीच होते.च्यायला, आता आपल्याला एकटं असताना भास पण व्हायला लागले की काय, असा विचार करत असतानाच, पुन्हा आवाज आला '' खरंचय नाहीच जमायचं तुम्हांला...!'' पुन्हा आवाज..नीट पाहिलं तर आवाज येत होता डाळीचं पीठ कालवत असलेल्या भांड्यातूनच... !
'' कळलं का नाहीच जमायचं तुम्हांला, माझ्यासारखं सगळ्यात मिसळून जायला..कधी कधी तरीही स्वतःच अस्तित्त्व वेगळं ठेवायला..'' '' म्हणजे?'' '' मी किती वेगवेगळ्या पदार्थात सहज मिसळून जातो ,कित्ती वेळेला माझी गरज पडते तुम्हांला ! आत्ताचंच बघ...भाजीचा पटकन होणारा उत्तम पर्याय म्हणून वापरता ना ब-याचदा मला तुम्ही ?म्हणजे हा रोजचा पदार्थ झाला,पण अगदी खास म्हणवल्या जाणा-या पदार्थातही असतो मी..ढोकळा, मोहनथाळ, बेसनाचा लाडू, सुरळीच्या वड्या, म्हैसूरपाक हे पदार्थ माझ्यामुळेच ओळखले जातात. पण तरीही ब-याच भाज्यांमध्ये साईड आर्टिस्टचं कामही करतोच की मी – मेथीची, पातीची डाळीचं पीठ पेरुन केलेली भाजी, कढी किती नावं सांगू? शिवाय शेव, भजी,फरसाण या चमचमीत पदार्थांची माझ्याशिवाय कल्पना तरी करु शकता का तुम्ही ?’’
बेसन की बात सोचनेवाली थी....!!

Saturday, October 2, 2010

Why 'GANDHIJI' ?


माझ्यासाठी,
१) मानवाच्या वैचारिक आणि माणुसकीच्या उत्क्रांतीतल एक खूप महत्वाचं आणि उन्नत शिखर!
२) जगातला सर्वश्रेष्ठ नेता, ज्यानं रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांना जिंकता येतं, हे दाखवून दिलं.
३)त्यांनी 'सत्य' सर्वश्रेष्ठ मानलं.
४) म्हणजेच चुका करत माणूस म्हणून जगण्याची मुभा आहेच, पण त्यातच समाधान न मानता, धीटपणे आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करण्याचा देवत्वाचा मार्गही दाखवला.
५) पैसा आणि संसाधनांनीच (resources) यश आणि समृद्धी आणता येते, हे त्यांनी खोडून दाखवलं.
६) आणि आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलं,
''वैष्णव जन तो तेणे कहिए जो,
पीड़ पराई जाणे रे!!''

Thursday, August 19, 2010

उतनी दूर मत ब्याहना ...बाबा |

खरंतर हा find आईचा. तिला आणि मला खूप आवडलेली ही कविता.'निर्मला पुतुल' नावाच्या हिंदी कवियित्रीची. संथाळी आदिवासी जमातीत जन्मलेल्या त्या! 'नगारे कि तरह बजते हैं शब्द !' हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. त्यांच्या काही कवितांचा अनुवाद सध्या कविता महाजन करत आहेत.
बाबा,
मुझे उतनी दूर मत ब्याहना,
जहाँ मुझे मिल जाने खातिर,
घर की बकरियां बेचनी पड़े तुम्हें
जंगल नहीं,पहाड़ नहीं जहाँ,
वहाँ मत कर जाना मेरा लगन
वहाँ तो कतई नहीं,
जहाँ की सडकोंपर
मन से भी ज्यादा तेज दौडती हो मोटरगाड़ियाँ

उस घर में मत जोड़ना मेरा रिश्ता,
जहाँ बड़ा सा खुला आँगन ना हो,
मुर्गे की बांग पर होती नहीं हो जहाँ सुबह
और शाम पिछवाड़े से जहाँ
पहाडीपर डूबता सूरज ना दिखे
मत चुनना ऐसा वर,
जो पोचई और हड्डियों में डूबा रहता हो अक्सर,
काहिल-निकम्मा हो,
माहिर हो मेले से लड़कियां उड़ा ले जाने में,
ऐसा वर मत चुनना मेरी खातिर
कोई थारी-लोटा तो नहीं
कि बाद में जब चाहे बदल लुंगी
अच्छा -ख़राब होने पर!

जो बैंत बात में बात करे लाठी डंडा की,
निकले तीर-धनुष, कुल्हाड़ी
जब चाहे चला जाए बंगाल,असम या कश्मीर
ऐसा वर नहीं चाहिए हमें
और उसके हाथों में मत देना मेरा हाथ,
जिसके हाथोंने कभी कोई पेड़ नहीं लगाए,
फ़सले नहीं उगाई जिन हाथोंने,
जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का साथ
किसी का बोज़ नहीं उठाया

ब्याहना हो तो वहाँ ब्याहना,
जहाँ सुबह जाकर शाम तक लौट सको पैदल ,
मैं जो कभी रोंऊ इस घाट
तो उस घाट नदी में स्नान करते तुम
सुनकर आ सको, मेरा करुण विलाप
चुनना ऐसा वर,
जो बजाता हो बाँसुरी सुरीली
और ढोल-मांदल बजने में हो पारंगत
बसंत के दिनों में ला सके जो रोज
मेरे जुड़े की खातिर पलाश के फूल ,
जिससे खाया न जाए
मेरे भूखे रहनेपर......
उसीसे ब्याहना मुझे !

Friday, June 18, 2010

एका विलक्षण भारी 'बयो'ची गोष्ट.


खूपच दिवसांपासून मला या पुस्तकावर लिहायचं होतं. ही कथा आहे चतुश्रुंगीच्या यात्रेतल्या पाळण्यात दरवर्षी नव्या अप्रूपानं बसणाऱ्या मुलीची, मेंटलमधल्या माणसांचे वाढदिवस जुन्या कागदांतून शोधून आवर्जून साजरी करणाऱ्या ' पेशंट काय फक्त औशधानेच बरा होतो काय?' असं विचारणाऱ्या डॉक्टरची, ही कथा आहे 'मुक्तांगण' मध्ये हेरखातं ठेवून ब्राऊन शुगरच्या पुड्या बरोबर पकडणार्या 'चतुर' व्यवस्थापकाची, स्वतःच्या पर्समध्ये नेलकटर ठेवून दिसेल त्या मुलांची नखं काढणाऱ्या डॉक्टरीण बाईची, कॅन्सर झालेला असूनही सतत उत्साहानं कामात राहणाऱ्या बाईची, केमोथेरपी चालू असताना त्या खोलीत सरोदची कॅसेट आणि ताजी फुले ठेवणाऱ्या नवर्याची, मुलींसाठी कपडे शिवणार्या आणि वाढदिवसाला आवर्जून पत्र लिहिणाऱ्या 'वेड्या' पण शिस्तशीर आईची. पुस्तकाचं नाव आहे - सुनंदाला आठवताना .


ही सुनंदा म्हणजे डॉ. सुनंदा अनिल अवचट.म्हणजे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य वापरायचं तर ही 'डोंगराएवढी' बाई उभी होती म्हणूनच अनिल अवचट मोठे होऊ शकले. अवचटांच्या 'स्वतःविषयी ' या पुस्तकात सुनंदाविषयी एक वेगळं प्रकरणच आहे, तेही वाचण्यासारखं आहे. हे पुस्तक सुनंदाच्या मृत्युनंतर १० वर्षांनी छापलं गेलं. व्यसनमुक्तीसाठी काम करणारी पुण्याची 'मुक्तांगण' संस्था डॉ. सुनंदा अवचट यांनीच उभारली, ते ही संस्थेच्या कामाचा कसलाच पूर्वानुभव नसताना! सामाजिक काम केल्याचा कसलाही आव न आणता स्वतःची नोकरी अगदी व्यवस्थित सांभाळून या बाईनी खूप काम केलंय.


या पुस्तकात पाच लेख आहेत. त्यातला 'सुनंदाला आठवताना' हा अनिल अवचट यांचा सह्जीवनावरचा आणि यशोदा वाकणकरचा 'आई, मी आणि पत्रं ' नावाचा हे २ लेख अप्रतिम आहेत. पहिल्या लेखात अनिल- सुनंदा या दांपत्याची सुरुवातीच्या काळातली भांडणं, भांडण्याचा अभ्यास करून कारण शोधण्याची पद्धत, एकमेकांसोबत वाढणं, एकमेकांचे वाढदिवस सिंहगडावर साजरे करणं, प्रत्येकाचा एकेक दोष मिटवण्याची भेट देणं, नकला करणं, तासभर चालणारी जेवणं यासोबतच नंतरच्या टप्प्यात सुनंदाला कॅन्सर आहे हे कळल्यावर कोलमडून न जाता अधिक उत्साहानं आणि रसिकतेनं जीवन जगणं., खरोखर वाचण्यासारखच आहे. रोज रात्री गोळ्या खाण्यासाठी 'आ ' करून तयार होणारी , 'या गोळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, मी नक्की बरी होणार आहे, कारण मला खूप काम करायचंय' असं म्हणणारी, केमोथेरपीनं डोक्यावरचे सगळे केस गेल्यावर खोटा विग नाकारणारी ,' करायचाय काय तो विग ? मला तू अन तुला मी आहे बस कि मग !' असं 'positive ' जगणं जगणारी सुनंदा बघून मी थक्क झाले. ''सुनंदा गेल्यावर माझा सिंहगड संपलाच, एकदा मुद्दाम प्रभू कुटुंबाला घेऊन सिंहगड फिरलो, सगळ्या जागा पहिल्या पण त्यात 'सुनंदापण' नव्हतं,'' असं बाबा म्हणतात.


शेवटचा यशोदाचा लेखही फार छान आहे, आईनं मुलीला प्रत्येक वाढदिवसाला दिलेली पत्रं त्यात आहेत.मला त्याबद्दल फार बोलता येणार नाही ,पण एक अगदी आतलं -आतलं नातं बघायला मिळतं. सुनंदानी लिहिलेलं एक पत्रच थोडक्यात उद्धृत करते.


''MY YASHO ,
MY NEAREST , MY DEAREST , MY INNOCENCE , MY JOY , MY SWEET SONG , MY FRIENDLY FRIEND , MY DELICATE DANCER , MY SUPPORT , MY CARE TAKER , MY LIFE , MY ONLY CONFIDENCE , MY CONFIDENCE IN CONFIDENCE .
-YOURS ,
आई.''


हे पुस्तक फक्त 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, आळंदी रोड, पुणे' इथंच मिळतं.खरं तर डॉ. सुनंदा अवचट या विषयावर एक आणखी वेगळं, स्वतंत्र पुस्तकच होऊ शकतं, असं वाटतंय. दर्जाच्या मानानं किंमत फारच कमी ठेवलीय - ५० रु.

Tuesday, May 18, 2010

'आंबट'शौकिनांसाठी ......

आपल्या एका आवडीच्या विषयाकडे मी गेले बरेच दिवस दुर्लक्ष केले आहे, असे माझ्या लक्षात आले.आणि मग काहीतरी उपाय तर करायलाच हवा , म्हणून मग ही पोस्ट- माझ्यासारख्या 'आंबट'शौकिनांसाठी...शिवाय प्रतिक्रिया म्हणून तुम्हीही काही पाककृती इथे add करू शकता. चविष्ट अश्या या पदार्थांच्या यादीत 'अग्रपूजेचा' मान मी सोलापूरच्या पाणीपुरीला देईन . सोलापूरसारखी अप्रतिम पाणीपुरी जगात कुठेही मिळत नाही. अतिशय टेस्टी ,स्वस्त आणि मस्त अशी ही गोष्ट. काळ्याशार माठातले थंडगार आंबट- गोड पाणी, कुडकुडीत पुर्या, शेव आणि हिरवी कांदापात.( पुण्याच्या पाणीपुरीला मला पाणीपुरी म्हणवत नाही, उकडलेले वाटाणे, बटाटा आणि देव जाणे काय- काय भरलेले असते त्याच्यात.. ) बस इतके भारी लागते ना हे प्रकरण. ते तसलं ultimate चवीचं पाणी फक्त सोलापूरचे पाणीपुरीवालेच करू शकतात - ५ रु.ला एक प्लेट,वर पुन्हा नुसतं पाणी ओरपायला फुकट ...सोलापूरच्या पार्क चौकात (तोच ..तोच हुतात्म्यांच्या पुतळ्याच्या चौक) एक मिनी चौपाटी आहे, तिथे प्रवेश करताना पहिलं दर्शन या पाणीपुरीच्या ठेल्यांचच घडतं. तेंव्हा कधीही सोलापूरला आलात तर पाणीपुरी खायला विसरू नकात.
आता कैरीच्या काही पाककृती:


मेथांबा :
साहित्य: एक कडक कैरी, अर्धी वाटी गूळ, तेल , १ टी .स्पू. जिरे, दीड टी . स्पू.मेथ्या , चवीपुरते मीठ आणि अर्धा टी .स्पू. तिखट ( ऐच्छिक ).
कृती : सोप्पी पटकन होणारी (आणि पटकन संपणारी ही पाककृती) . कैरी धुऊन, पुसून तिचे साल काढा.बोटाच्या पेराएवढे, छोटे -छोटे तुकडे करा. गूळ चिरून घ्या. कढई पुरेशी तापली की, त्यात २ टे.स्पू. तेल ओता, ते तापले की लगेच त्यात जिरे आणि चिमुटभर हिंग टाका. त्या नंतर मेथ्या टाका,त्या तेलावर खरपूस होऊन तरंगू लागल्या की, गूळ टाका, मंद आचेवर तो विरघळू लागला की कैरीचे तुकडे आणि मीठ टाका. डावाने अधून मधून हलवा. गरज पडल्यास थोडेसे पाणी टाका. हवे असल्यास तिखट मिसळा. साधारण १० मिनिटात हे शिजेल.(कैरी थोडी मऊसर व्हायला हवी) मग गार झाल्यावर एका स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत मेथांबा भरा. पोळी, ब्रेड ,खिचडी कशाहीसोबत अतिशय मस्त लागतो.
हा फ्रीजशिवायही ५ दिवस टिकतो(मात्र तेंव्हा त्यात पाणी नको) .मेथांबा काढताना कोरडा चमचाच वापरा .मेथ्यांची कडवट चव लागत नाही,उलट खूप मस्त लागतो.

कैरीभात :
साहित्य : १ वाटी तांदूळ (शक्यतो इंद्रायणी/आंबेमोहोर/ बासमती ) , अर्धी वाटी कैरीचा कीस, चवीपुरते मीठ आणि साखर, २ टे.स्पू .तेल , फोडणीचे साहित्य, ३ उभ्या चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, मुठभर चिरलेली कोथिंबीर, मुठभर शेंगदाणे / डाळे (ऐच्छिक ).
कृती : हा नागपूरकडे केला जाणारा पदार्थ. प्रथम तांदूळ निवडून, धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना अर्धा टी. स्पू .तूप आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा. भात मोकळा होण्याकरिता हे आवश्यक आहे.मग भात शिजला की बाजूला काढा. एका कढईत तेल तापवून मोहरी , हिंग, जिरे, कढीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करा. फोडणीत हळद टाकू नका, करपू देऊ नका, हवे असल्यास दाणे / डाळे टाका, हलवा. मग शिजलेला भात त्याच्यात टाकून मंद आचेवर परतवा. मग मीठ आणि किंचित साखर टाका. कैरीचा कीस मिसळा पुन्हा तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. मग उतरवून त्यावर कोथिंबीर टाका.(फार आंबट आवडत नसल्यास पाव वाटीच कैरी घ्या,शिवाय लिंबू रसही आहेच.)

Thursday, March 18, 2010

....म्हणे साधा कारकून माणूस!

त्यांनी मला बसायला खुर्ची वगैरे दिली
( तिसर्यांदा भेटायला गेलो होतो ना! )
स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी,
मी दिलेलं पाकीट हातात घेतलं.
(वा! अगदी खरं सांगतो, अगदी धन्य-धन्य वाटत होतं. )

माझी साधी फुलस्केपाची पानं हाती धरून,
चष्म्याच्या आडून डोळे बारीक करून
माझ्याकडे बघत 'संपादकसाहेब' म्हणाले,
"हं...मग काय, कुठल्या चळवळीत वगैरे काम करता तुम्ही?"
"चळवळ ...छे..छे.. मी कुठल्या चळवळीत वगैरे नाही."
''मग डाव्या, समाजवादी विचारांचे वगैरे असाल!"
''हं.. म्हणजे तसं वाचतो बऱ्यापैकी मी,
पण त्या विचारांचाच आहे, असं नाही हो म्हणू शकणार."
"अच्छा..मग पर्यावरणवादी असाल, नाही का?"
''तसं ..आवडतं मला झाडापेडात राहायला,
पण म्हणून काही लगेच मी पर्यावरणवादी होत नाही ना!"

मग हळू आवाजात त्यांनी मला विचारलं,
"काय एखादी बडी जाहिरात देताय वाटतं आम्हांला?"
"छे हो साधा कारकून माणूस मी, मी कुठून देणार बडी जाहिरात?
हं.. लिहिण्याबद्दल म्हणत असाल तर, बरं वाटतं लिहिल्यावर म्हणून लिहितो हो मी!" - इति गोंधळलेला मी.

"ठीकाय. राहूदेत मग हे आमच्याकडे. या तुम्ही!"
"धन्यवाद . निर्णय कळवाल ना ."
"हां ..बघूयात.." -माझ्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करत संपादकसाहेब.
मी दरवाज्याबाहेर पडलो.
"लईच आम आदमी दिसतोय हा !
कशासाठी छापायचं याचं साहित्य ?"- इति इतका वेळ गप्प बसलेले दुसरे संपादकसाहेब.

"हो ना आडनावावरनं हा काही दलित वगैरेही वाटत नाही"
"हो ..रे मुस्लीम, अल्पसंख्याक ...किमान बाई असला असता ना तरी छापलं असतं याचं लिखाण!"
"आपल्या संपादकाला नाही उद्योग ...नसता झंझट स्साला..
काय आमचा मेव्हणा आहे की काय .. याला प्रत्यक्ष भेटायला?"

"encash तरी कसं करायचं याला - म्हणे साधा कारकून माणूस! "

Monday, February 22, 2010

ऐकण्यासारखे काही -

तुम्ही radio कितपत ऐकता ? म्हणजे माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ मी radio ऐकण्यात घालवते, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती व्हायची नाही इतका मी radio ऐकते .
दर रविवारी सकाळी ७ ते ११ पुण्याच्या radio city ९१.१ FM वर 'मराठमोळी सकाळ ' नावाचा एक अप्रतिम, लई भारी मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागतो. 'ऋतू हिरवा' ची अख्खी कॅसेट, 'देवाघरचे ज्ञात कुणाला' , ' जैत रे जैत 'ची गाणी, जुनी नाट्यगीतं त्याचबरोबर नवीन ' गालावर खळी..' इ. इ मस्त गाणी लागतात. बाकी radio city वर आठवडाभर काही फार ऐकण्यासारखे नसते. (त्यातला तो 'छोटा छत्री 'नावाचा प्राणी तर महा वैतागवाणा आहे, एक वेळ 'सूद' परवडला.)
बाकी आठवडाभर (दिवसा ) मी जास्तीत जास्त ऐकते Red FM ९३.५ यावरचे कार्यक्रम. नेहमीपेक्षा थोडे वेगळे आहेत. खासकरून यांचे निवेदक - नेहमी सारखी नम्र , गोड आवाजाची मंडळी नाहीत. उदा. सकाळी १० ते १२ दरम्यानची 'मानसी ' नावाची निवेदक. काही नाही फक्त bollywood ची gossip ती ऐकवते, पण ती असली जबर आहे की बस रे बस , पंजाबी भाषेत ती पार 'वाभाडे ' काढते सगळ्यांचे! (बऱ्याचदा 'अति'ही करते, हे ओघानं आलंच)
याच्यावरचे इतर कार्यक्रम ' हटके ' आहेत. उदा. 'कवी की कल्पना ' नावाचा एक कार्यक्रम -''झुबी डुबी झुबी डुबी पम्पारा , नाचे ये पागल स्टुपिड मन '' - अरे भाई, वहा बेचारी झुबी डूब रही है, और कवी का पागल मन नाच रहा है , कैसी idiot टाइप की कल्पना है असं काही तरी 'desection ' चाललेले असते .
यांची 'बिजलीबाई' तर एकदम कडक आहे, भ्रष्टाचारी, फसवणूक, करणाऱ्या लोकांना ती असलं भारी फटकारते, ते सांगण्यात मजा नाही( त्या आवाजानं उषा नाडकर्णीची आठवण होते ) , ऐकून बघा . 'पप्पुदिया' पण भारी आहे. एकूण Red FM हा चांगला Timepass आहे .

Sunday, January 31, 2010

फुलपाखरू व्हायचं असेल तर ......

फुलपाखरू व्हायचं असेल तर ,
कोषात गुंतून थोडा काळ वेगळं व्हावंच लागतं .
आपल्याच रंगात रंगायचंय आपल्याला ,
हे मनाशी पक्कं करावं लागतं .
कोष तोडायला सुद्धा इतरांची मदत नाही घ्यायची ,
आपली लढाई आपणच लढायची .
पण फुलपाखराने इतकं सारं करूनही भागत नाही हो ,
कारण फुलपाखरं बघायची असतील ज्यांना ,
तर मग फुलं -पानं , किमान थोडी हिरवळ जपायचं भानही हवंच ना त्यांना !!

Friday, January 22, 2010

सोलापूरचे ४ हुतात्मे .


' जानेवारी ' महिना आम्हां सोलापुरकरांसाठी खूपच महत्वाचा असतो. या महिन्यातल्या दोन विशेष घडामोडी म्हणजे , एक म्हणजे संक्रांतीनिमित्त भरणारी श्री . सिद्धरामेश्वर यात्रा आणि दुसरं म्हणजे , हुतात्मा दिन. 'गड्डा ' यात्रेसंबंधी परत कधीतरी लिहीन . आज सोलापूरच्या ४ हुतात्म्यांविषयी :
माझ्या गावानं स्वातंत्र्यपूर्व काळात ३ दिवसांचं ' स्वातंत्र्य ' उपभोगलं होतं .शिवाय सोलापूर ' Muncipal Council ' (तेव्हाची , आता Muncipal Corporation ) ही स्वतःच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी देशातील पहिली Council आहे . १९३० मध्ये महात्मा गांधींना अटक ( बहुधा 'असहकार ' आंदोलनामुळे ) , झाल्यावर देशभर प्रक्षोभ उसळला , आंदोलनं , मोर्चे सुरु झाले .सोलापुरातही याचे जोरदार पडसाद उमटले होते .काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी निषेध नोंदवत सभा घेतल्या.पुण्याचे स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूर 'Muncipal Council ' वर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला . दरम्यान मंगळवार पेठ पोलीस चौकीवर, सशस्त्र हल्ला करण्यात आला . पोलीस आणि सरकारी अधिकारी गाव सोडून पळून गेले .तेंव्हा , काँग्रेसचे तेंव्हाचे नेते तुळशीदास जाधव आणि रामकृष्ण जाजू इ.नी संपूर्ण कायदा, सुव्यवस्था सांभाळली होती .( ९-११ मे १९३० )हेच ते स्वातंत्र्याचे ३ दिवस .
नंतर सोलापूरमध्ये ' मार्शल लॉं ' लागू करण्यात आला .जमावाला भडकावणे , सशस्त्र हल्ला करणे , पोलीस अधिकाऱ्यांचा जीव घेणे असे आरोप ४ जणांवर ठेवण्यात आले .त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली . उच्च न्यायालयानेही तीच शिक्षा कायम ठेवली आणि १२ जानेवारी १९३१ रोजी चारजण पुण्यात फाशीवर चढवले गेले .हेच ते ४ हुतात्मे -
हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी ,
हुतात्मा किसन सारडा,
हुतात्मा कुर्बान हुसेन आणि
हुतात्मा जगन्नाथ शिंदे .
सोलापूरच्या पार्क चौकात या चौघांचे पुतळे आहेत . सोलापूरच्या रंगमंदिराचं , तसच सोलापूर -पुणे एक्स्प्रेसचं नाव या हुतात्म्यांवरून देण्यात आलं आहे .

Saturday, January 16, 2010

पुन्हा सुनीताबाई !

गेल्या आठवड्याच्या लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीत डॉ. लता काटदरेंच्या लेखात सुनीताबाईची आणखी एक खूप चांगली आठवण वाचली . 'आनंदवनातल्या अंध , स्पर्शातून शिकणाऱ्या मुलांना , गुलाबाचा स्पर्श त्या फुलाला काटे असल्यानं अनुभवता येत नाही ' अशी खंत एकदा बाबा आमटेंनी सुनीताबाईसमोर व्यक्त केली होती .पुढच्या वेळेला आनंदवनात जाण्यापूर्वी , सुनीताबाईनी खूप शोधाशोध करून ' बिनकाट्याच्या ' गुलाबाचं रोप मिळवलं .आणि बाबांना ते रोप आनंदवनात लावण्यासाठी दिलं - अंध मुलं गुलाबाचा स्पर्श घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून !
इतक्या उत्कट संवेदनशील बाईला कुणी माणूसघाणी , कठोर म्हणत असेल तर ......च्यामारी मी बघतेच त्यांच्याकडे !
(अर्थात मी काय बघणार म्हणा ? पण आजकाल याच भाषेत बोललं जातं. म्हणून ....)

Saturday, January 9, 2010

सुनीताबाईविषयी - अंतर्नाद जाने . १०


' अंतर्नाद ' चा जानेवारी २०१० चा अंक जवळ - जवळ ' सुनीताबाई देशपांडे ' स्मृती विशेषांक म्हणता येईल . मंगला गोडबोलेंचा ' लखलखीत ' , प्रा. मिलिंद जोशींचा आणि सर्वोत्तम ठाकूरांचा असे तीन स्मृतिपर लेख आहेत .
यातला मला सर्वात आवडला तो - सुनिताबाईंच्या भावाचा - सर्वोत्तम ठाकूर यांचा ' आमची माई ' नावाचा लेख . लेख खरंच फार अप्रतिम आहे . ' सुनीताबाई ' नावाची कसली तेजशलाका होती - ते दाखवणारा !
त्यांच्या लहानपणाच्या आठवणींपासून -त्या कशा ४२ चा लढ्यात भाग घ्यायला बाहेर पडल्या , कायम स्वकष्टार्जित जीवन कशा जगत होत्या , कवितांवरचं प्रेम , भाईंच्या साहित्याचं documentation आणि perfection .अशा कितीतरी गोष्टी - काही लेखातलच उद्धृत करते .-
'' रत्नागिरीच्या पटवर्धन शाळेत माई शिकली .त्या शाळेवर तिचा खूप जीव होता .शाळेला १०० वर्षं पूर्ण होताना निधी जमवण्यात येत होता.तेंव्हा माईनं ताबडतोब एक वैयक्तिक धनादेश पाठवला - तो कुठल्याही दालनाला स्वतःचं नाव द्यावं म्हणून तो नव्हता .तो प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी आणि सोयींसाठी दिला होता ,इतर वेळेला दिलेल्या देणग्यात कुठंही आपलं नाव येऊ नये ,म्हणून सदैव दक्ष असणाऱ्या माईनं यावेळी मात्र आपल्या देणगीचा उल्लेख करणारा फलक लावायला सांगितला - हे पाहून दुसरेही देणगी देतील म्हणून , आणि घडलंही तसंच !
'' अशीच जगावेगळी वाटणारी मदत माईनं डॉ. प्रकाश आमटेंना पाठवली होती . हेमलकशाच्या त्यांच्या प्रकल्पात अनेक दुर्मिळ प्राणी आहेत -वाघ , साळीदर ,घुबडं इ. त्यांना सांभाळताना काही वेळा शासनानेही हे 'कृत्य बेकायदेशीर आहे ' असं म्हणून नोटीसा पाठवल्या होत्या . ' मानवेतर प्राण्यांच्या संगोपनासाठी ' म्हणून माईनं ५ लाख रुपयांची मदत पाठवली होती ."
'खरया गरजेला पुरेशी मदत ' हा दंडक असणाऱ्या सुनीताबाई , मदत देताना सखोल चौकशी करत .'पु. ल. देशपांडे फौंडेशन' , शेवटी विश्वस्त तित्यक्याच आपुलकीनं आणि काटेकोरपणे चालवतील; की नाही , ही शंका आल्यानं शेवटी त्यांनी ते फौंडेशन विलेपार्लेच्या 'लोकमान्य सेवा संघ' या विश्वासू संस्थेत विलीन केलं .
''प्रत्येक काम परिपूर्ण आणि सुंदर असावं , याविषयी माई दक्ष असायची .एकदा पाहुणे आलेले असताना , आम्ही डाळिंब सोलून देत होतो . दाण्यांवर जराही पातळ , पांढरा पापुद्रा राहू नये ,असं काळजीपूर्वक आम्हां दोघांचं काम सुरु होतं . मी कंटाळलो , पाहुणे दाणे न बघताच तोंडात टाकतील . मग इतका त्रास कशाला घ्या ? अशी कुरकुर केली . तेंव्हा माई म्हणाली ' मी डाळिंब हे असं सोलते , ते पाहून कुणी 'व्वा !' म्हणावं म्हणून नाही . दाण्यांना थोडीशीही साल असलेले दाणे , मला इतरांना द्यायला आवडणार नाहीत .मी दिलेली कोणतीही गोष्ट खराब असू नये असं मला वाटतं .' माईनं हे जन्मभर जपलं. ''
रद्दीवाल्या बाईसोबतचा किस्साही वाचण्याजोगा आहे , सगळच सांगत बसत नाही . लेख मिळवून तुम्ही वाचा . एक अत्रेंच्या शब्दात म्हणावसं वाटतंय ,'' असली जोडी गेल्या १० हजार वर्षात झाली नाही , आणि पुढच्या १० हजार वर्षात व्हायची शक्यता नाही !! ''.